आंजर्ले खाडीतील गाळ उपसण्यात न आल्याने खाडी गाळाने भरली आहे. वादळापासून नौका सुरक्षित ठेवण्यासाठी आजही हर्णै बंदरातील मच्छीमार या खाडीचा आधार घेतात. वादळ झाल्यावर नौका सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हर्णै बंदर सुसज्ज जेटीअभावी कुचकामी ठरते. अशावेळी नौका सुरक्षित ठेवण्यासाठी आंजर्ले खाडीत नेऊन नांगरण्यात येतात. त्यामुळे या खाडीला महत्त्वाचे स्थान आहे.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhgDQhbjttUNJjEpbm5p2WOSCCctoSYWJhInr-CqfiRpX5Ea1tYWg8O_UCCbEFQ1OI3TutBOAjmGwqkyphal2fkFWuWHfpHWIv_1De66tPuyA1NJ73Be2hGAETVzdA00NTt3eItE5lN116y/s320/2012-04-08+17.30.32.jpg)
या खाडीअंतर्गत मासेमारी चालते. बोय, पालू, शिंगटी असे मासे पकडले जातात. तसेच कालव, शिंपल्या, खेकडेही पकडले जातात. या खाडीअंतर्गत चालणाऱ्या मासेमारीमुळे अनेकांना आर्थिक लाभ होतो. अडखळ मोहल्ल्यातील काही कुटुंब तर खाडीतील खेकडे, कालवे, शिंपल्या पकडून त्या विकून गुजराण करतात. खाडीत गाळ भरून ती उथळ झाल्याने याअंतर्गत चालणाऱ्या मासेमारीला फटका बसला आहे. कारण खाडी जेवढी खोल तेवढी माशांची संख्या जास्त. याबरोबरच गाळामुळे खाडी उथळ झाल्याने उधाणाच्या भरतीच्यावेळी खाडीचे पाणी खाडीच्या दुतर्फा असलेल्या शेतांमध्ये घुसून शेतजमीन खारवट होत आहे. यासाठी आता खाडीतील गाळ उपसणे गरजेचे आहे.
(c) Copyright 2010, Shreerang Ketkar, All Rights reserved.