Sunday, 3 August 2014

पाचुचे बेट

आंजर्ले हे गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या अगदी उत्तर टोकाला असलेल्या दापोली तालुक्यात वसलेले आहे. आंजर्ल्याच्या पूर्वेस मुर्डी व सुकोंडी ही गावे आहेत. पश्चिमेस हिंद महासागर, दक्षिणेस जोग नदी अथवा आन्जर्ल्याची खाडी व उत्तरेस आडे - पाडले व लोणवडी ही गावे आहेत. अर्थात, आंजर्ले हे गाव पूर्वेस सह्याद्री व पश्चिमेस हिंद महासागर यामधील अरुंद पट्टीत वसलेले आहे. आंजर्ले ग्रामपंचायतीची स्थापना 1940 साली झाली.

एका बाजूला डोंगराच्या पायथ्याशी वसलेले जैवविविधतेने समृद्ध खेडे आणि दुसऱ्या बाजूला रुपेरी वाळू व माडाच्या बागांतून सागरकिनार्यावरची सफर म्हणजे आंजर्ले.

आंजर्ले बस स्थानकाच्या आजूबाजूस डोंगरावर वसलेल्या वस्तीला बिरवाडी म्हणतात. बिरवाडी किंवा बहीरवाडी हेच मूळचे आंजर्ले गाव. आंजर्ले बस स्थानकाच्या जवळ असणाऱ्या रामाच्या देवळापासून दक्षिणे कडील वस्तिला पेठपाखाडी म्हणतात. हा भाग आदिलशाहीतील शिर्के याच्या अमदानीत वसलेला आहे. समुद्राला समांतर नीटनेटके वसलेल्या परिसराला उभागर म्हणतात. उभागरातून केळशी पर्यंत जाणारा रस्ता 1730 साली बनवण्यात आला. 1858 साली या रस्त्याचे रुंदीकरण झाले.आता या रस्त्यावरून दापोली ते केळशी बस धावते.

आंजर्ले गावाच्या दक्षिणेला हर्णै व त्यापलीकडे मुरुड ही गावे आहेत. मुरूडमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने खूप सोयी आहेत. मार्च महिन्यात मुरूड - हर्णै येथे 'डॉल्फिन - कासव' महोत्सव साजरा केला जातो.

आंजर्ले गाव फार पूर्वीपासून संस्कृत वेद शाळेसाठी प्रसिद्ध होते. ही वेद शाळा 1646 साली हरभट नित्सुरे यांनी स्थापन केली. या वेदशाळेत संस्कृत धार्मिक ग्रंथाचे शिक्षण गुरुकूल पद्धती प्रमाणे मोफत दिले जात होते. या वेदशाळेतून अनेक दशग्रंथी ब्राम्हण शिकून तयार झाले.