आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सांगितलेले हवामान खात्याचे पावसाचे अंदाज बरेचदा चुकतात. पण निसर्गनियमानुसार पक्ष्यांना मिळणारे अंदाज शक्यतो बरोबर असतात. पशुपक्ष्यांना पावसाळ्याआधीच तसे पूर्वसंकेत मिळतात. त्यांच्या हालचाली आणि दिनक्रमातील बदल यांच्या बारीक निरीक्षणावरुन हे संकेत लक्षात येतात.
निसर्गातल्या बदलाची पहिली चाहूल वन्यपशू-पक्ष्यांना लागते आणि मग त्यानुसार त्यांच्या वर्तनात फरक पडू लागतो. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ऋतू कुठलाही असू दे, वातावरणातील बदल सगळ्यात आधी त्यांच्या ध्यानात येतात. त्यानुसार त्यांच्या हालचालीत बदल होतांना दिसतात. कारण पक्षिजात अत्यंत संवेदनशील आणि बदलत्या हवामानाशी स्वत:ला जुळवून घेणारी निसर्गाची निर्मिती आहे. त्यातही पावसाच्या आगमनाची-विलंबाची पहिली चाहूल लागते, ती टिटवीला. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिशिर ऋतूपासून टिटवी पक्ष्यांच्या जीवन कार्याचं मी निरीक्षण करत होतो. यावेळी नोंदवलेली निरीक्षणं वैशिष्ट्यपूर्ण होती.
यावर्षी जानेवारीच्या प्रारंभीच टिटवी पक्ष्यांच्या नर-मादीच्या जोड्या घरटं बनवणं आणि मिलनकार्यात गुंतल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारीच्या अखेरीस मादीने घरट्यात अंडी घातली. मार्चच्या अखेरीस त्यातून पिल्लंही बाहेर पडली. जवळपास पिल्लं एक महिन्याची असतांना एप्रिलच्या अखेरीस टिटवी नर-मादीने परत मिलनकार्य सुरु केलं. मे मध्ये परत अंडी घातली आणि जून प्रारंभी परत अंड्यातून पिल्लं बाहेर पडली. जून अखेरीस पिल्लं बऱ्यापैकी मोठी झाली आणि हळुवारपणे पंखही फडफडवायला लागली. वास्तविक या पक्ष्यांच्या विणीचा एकच हंगाम असताना यावेळी मात्र त्यांनी दोनवेळा अंडी घातली. हा बदल यावर्षी उशिरा येणाऱ्या पावसाचाच निदर्शक होता. कारण वातावरण, अन्नाची मुबलकता, पावसाचं आगमन आणि सुरक्षितता इ. गोष्टींचा अंदाज घेऊनच हे पक्षी विणीच्या हंगामात एकदा किंवा दोनदा आपलं प्रजोत्पादनाचं कार्य करीत असतात.
मृगनक्षत्र वेळेवर असल्याचे संकेत आफ्रिकेतून येणारे चातक पक्षी देतात. चातक पक्ष्यांचं आगमन आणि त्यांच्या 'पिऊ-पिऊ' आवाजाने माणूस सुखावतो. यावर्षी जून अखेरपर्यंत चातकाचं आगमन झालं नाही. त्यामुळे चातक पक्ष्यांचा विणीचा हंगामही लांबला जाईल. पाऊस उशिरानं येण्याचा अंदाज चातक पक्ष्यास आला असावा, असं वाटतं. कारण या परिसरातील नभांगणात कृष्णमेघांनी अद्यापर्यंत एकदाही रुंजी घातल्याचं दिसून आलं नाही. चातक, पावशा व कोकीळा हे पक्षी कावळ्याच्या घरट्यात अंडी घालतात.
शेतक-यांसाठी दुसरा महत्वाचा पक्षी म्हणजे पावशा. आमराईतून 'पेरते व्हा, पेरते व्हा' असा पावशाचा आवाज आला की मगत शेतकरी मशागतीच्या कामाला लागतो. आजही आपल्या देशातील बहुसंख्य गावात या पावशाच्या आगमनाची आणि आवाजाची वाट पाहिली दाते. पावशाचा हा आवाज अजूनही यावर्षी ऐकायला मिळाला नाही.
महाभारतात अर्जुनाला जसं पूर्ण पुरुष संबोधलं गेलं आहे, तसंच पक्ष्यांमध्ये कावळा या पक्ष्याला पूर्णपक्षी म्हटलं जातं. मे महिन्यात वड, पिंपळ, आंबा इ. महावृक्षांवर जर कावळ्याने घरटं केलं असेल, तर पाऊस चांगला पडतो आणि बाभूळ, सावर अशा काही काटेरी झाडांवर घरटं केलं तर पाऊस कमी पडतो, असा अनुभव आहे. माझ्या निरीक्षणाप्रमाणे यावर्षी कावळ्यांनी बाभळीसारख्या झाडांवर घरटी केली आहेत. जून महिना संपला. पावसाचा थेंब नाही. म्हणजे यावर्षी पाऊस निश्चितच लांबणार हा अंदाज कावळ्यांना आला असावा. कावळ्याचे घरटे जर झाडावर पश्चिमेकडे असेल तर पाऊस कमी पडतो. पूर्वेकडे असेल तर पाऊस भरपूर पडतो. झाडाच्या टोकावर घरटे बांधले असेल तर दुष्काळ पडतो.
पाऊस जर वेळेवर येणार असेल तर त्यापूर्वी उधईला पंख फुटतात. जमिनीतून लाखो पंखाचे किडे पावसाळयापूर्वी वारुळातून बाहेर पडतांना दिसतात. पंख फुटले की त्यांचं प्रजनन कार्य सुरु होतं. अवघ्या काही मिनिटातच आपलं जीवनचक्र पूर्ण करतात. अशा पंखांच्या किड्यांचे ढग शहराच्या काठावरील रस्त्यांवरच्या विजेच्या दिव्याखाली दरवर्षी पाहायला मिळतात. तसंच पहाटे माळरानावर किंवा मोकळ्या मैदानात अशा किड्यांवर तुटून पडणारे घारी, कोतवाल, मांजर, कोल्हे आणि सरपटणारे असंख्य जीव पाहणं ही एक वेगळीच अनुभूती असते. मी ती दरवर्षी अनुभवत असतो. यावर्षी मात्र अजूनही हे दृश्य पाहायला मिळालेलं नाही. याचा अर्थ लांबलेल्या पावसाचा अंदाज या पंखांच्या किड्यांनाही असावा.
सरपटणा-या जीवांमध्ये सर्पमादी वर्षा ऋतुचं आगमन उशिराने असेल तर कमी अंडी घालते. असा उल्लेख काही पुस्तकात आहे. पाऊस वेळाने आणि कमी असेल तर सापाच्या पिल्लांना कमी भक्ष्य मिळतं आणि त्यामुळे सापांची संख्या कमी होऊन ज्या पक्ष्यांचं अन्न साप आहेत, त्यांचीसुध्दा उपासभार होऊन वंशवेल पाहिजे त्या प्रमाणात वाढत नाही. आणि म्हणून असे शिकारी पक्षीसुध्दा आपल्या प्रजोत्पादन कार्यात बदल करतात. त्याचप्रमाणे उंदीरसुध्दा पाऊस वेळेवर आणि भरपूर असेल तर त्यांची वीण वेळेवर होऊन पिल्लांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे उंदरावर आधारित असलेले साप व इतर जीव यांची वीणही वेळेवर होते. आणि भरपूर अन्नामुळं पिल्लांची वाढही झपाट्याने होते. यावर्षी याचं प्रमाणसुध्दा अत्यंत कमी दिसून आलं.
वृक्षराजींनासुध्दा पावसाचे संकेत कळतात. कारण सोनपिवळया फुलांचा बहावा म्हणजेच अमलतास यावर्षी मे च्या शेवटी बहरायला लागला. तो एक महिना आधी फुलायला पाहिजे होता.
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या चार-पाच दशकांच्या जंगलाच्या प्रगाढ अभ्यासाप्रमाणे हरितपर्णी वृक्षांची वनं आणि शुष्कपर्णी पानगळीची जंगलं वातावरणातील बदलांचे पूर्वसंकेत देतात. जंगलातील सजीवसृष्टीच्या दिनक्रमातील आश्चर्यकारक बदलांचा अभ्यास केल्यावर पावसाबद्दलचे अचूक आडाखे बांधता येऊ शकतात. पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळात हरिणी पिल्लांना जन्म देत नाही. मेळघाटच्या जंगलात गर्भवती वाघिणीने डायसकोरिया कंद खाऊन गर्भपात करवून घेतल्याची निरीक्षणं मारुती चितमपल्ली यांनी नोंदविली आहे. कारण पाऊस येणार नाही त्यामुळं रानात गवत राहणार नाही. आणि गवतच नसल्याने तृणभक्ष्यी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी आपल्या पिल्लांना भक्ष्य मिळणार नाही, म्हणजेच पिल्लांची वाढ होणार नाही, ती टिकणार नाहीत, याची पूर्वकल्पना वाघिणीला असल्यानेच तिने गर्भपात करवून घेतला, असंही त्यांनी म्हटलं आहे.
कुठल्याही निर्मितीचा प्रमुख आधार हा त्यावेळचं वातावरण असतं. जसं सुखातून दु:ख जन्म घेतं. तसंच संकटाच्या वातावरणातून त्यावर मात करण्याचा उपायही सुचतो. निर्मिती आणि विनाश आणि विनाशातून परत निर्मिती हे निसर्गचक्र असंच सुरु राहणार आहे. पृथ्वीच्या निर्मितीपासून चालत आलेलं हे निसर्गविज्ञान आहे. त्याचं ज्ञान मिळवण्यासाठी निसर्गावर प्रेम करणा-यांनी, निसर्ग अभ्यासकांनी पावसाळ्यापूर्वी सजीवसृष्टीत होणा-या बदलांचा अभ्यास केला पाहिजे. कारण हवामानाचा अंदाज वर्तवतांना ते अत्यंत मोलाचं ठरु शकतं.
आभार मारुती चितमपल्ली, प्र.सु. हिरुरकर,